पळस ( Sacred Tree ), होळीला नैसर्गिक रंग
पळसाची फुले |
होळीच्या सणाला पाहिजे असलेला रंग जो आज बाजारात, लहान सहान खेड्यातही मिळतो तो पूर्वी फारसा मिळत नव्हता. किंवा एखाद्या दुकानातून रंग खरेदी करुन रंगपंचमीला रंग खेळण्यापेक्षा पळसाच्या फुलांचा रंग काढून पीचकारीने रंग उडविणे जास्त आनंददायक वाटायचे. वसंतपंचमी आणि पळस या दोन्ही गोष्टी लहानपण आणि बरेच आठवणी काढून देतात.
पळसाच्या फुलांचा रंग हा एकदमच सुंदर वाटायचा सोबतच तो नैसर्गिक असल्याने शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नव्हते. लखलखत्या उन्हात जंगलात आगीची ठिणगी असल्यागत हे फुले बहरलेले दिसतात. म्हणूनच यास " Flame of Forest" असे सुध्दा म्हंटले जाते. आणि पाहायला तर इतके मनमोहक असतात की, एखादा चित्र टिपण्याचा मोह आवरने कठीणच.
पळसाचे झाड |
पळस हा एक बहुपयोगी वृक्ष आहे. गर्द हिरव्या पानांची सावली तर खूपच गारवा देऊन जाते. पळसाच्या पानांच्या पत्रावळी मधे तर तुम्ही जेवण केलेच असाल. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आजही काही गावात पळसाच्या पानांच्या पत्रावळीत लग्न कार्यक्रमाला जेवण वाढण्यात येते.
तसेच उन्हाळ्यात पाणी पिण्यास किंवा दह्या पासून बनलेली कळी किंवा वरण पिण्यासाठी द्रोन ( ज्याला काही ठिकाणी डोना म्हणतात ) पळसाच्या पानांचा उपयोग केला जातो. आमच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांनी या पानांचा उन्हापासून संरक्षण म्हणून टोपी आणि चप्पल म्हणूनही उपयोग केलेला आहे.
खूप उन्हाळी लागली की पाने उपयोगात येतात. आजही पळसाच्या पानांच्या साहाय्याने बनलेल्या मंडपात बसून निवांत गप्पा मारतो. लग्न समारंभाला पळसाच्या झाडांची आठवण येतेच कारण त्या दिवशी या वृक्षाचे वेगळेच महत्त्व आहे.
पळसाला पाने तीनच |
आमचे वरिष्ठ मंडळी आमच्याकडुन काही चुका झाल्या की, किंवा आमच्या प्रगतीबद्दल " पळसाला पाने तीनच" हा शब्दप्रयोग नेहमीच वापरत असत आणि आजही वापरतात.
खरच हे अद्भुत आहे. हे वृक्ष ५०फूट उंच वाढत असावे. पळसाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यामधे काही वृक्ष झुडपी स्वरूपाचे दिसतात. केशरी, पांढरे व पिवळे फुले असणारी पळस वेगवेळ्या ठिकाणी त्या प्रदेशानुसार आपल्याला पाहायला मिळतात. या वृक्षाचे इंधन म्हणून ग्रामीण भागात उपयोग केले जाते. त्याबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही या वृक्षाचे खूप उपयोग केले जाते. पोटाच्या विकारावर या वनस्पती चा उपयोग केला जातो.
ग्रामीण भागातील लोक मासे विक्री, लहान मुलांचे खाद्य विक्री पळसाच्या पानावर करत असतात. ही एक चांगली पद्धत असून प्लास्टिक पिशव्या वापरातून भू प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त आहे सोबतच पाने जमिनीत विघटनशिल आहेत.
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box